उस्मानाबाद जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर 

ग्रामपंचायत निवडणुकीतही ओबीसींना आरक्षण नाही 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील १७७  ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीतही ओबीसींना आरक्षण देण्यात आले नाही .


ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या आरक्षण सोडतीत ओबीसींना डावलले गेल्याचा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून आरक्षणाबाबत  ओबीसी समाजाला वार्‍यावर सोडणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत अन्याय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडती आज झालेल्या आहेत. यामध्ये ओबीसींचे आरक्षण डावलण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षापासून ओबीसींचे राजकीय आरक्षणाबाबत उदासीन असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गावगाड्यातील ओबीसी समाजाला देखील आज आरक्षण डावलण्यात आले आहे. यामुळे महाविकास आघाडीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे भाजपने म्हटले आहे. 

ओबीसी समाजाला निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवण्यासाठी राजकीय आरक्षण घालवण्याचे महापाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणार्‍या महाविकास आघाडी सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नही, असेही ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.