उस्मानाबादचे नगराध्यक्ष शिवसेनेचे, पण नामांतर ठराव घेण्यास कचरत आहेत... 

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा आरोप 
 

उस्मानाबाद - उस्मानाबादचे नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत, पण उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा ठराव घेण्यास कचरत आहेत, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. 

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करावे, या मागणीचे निवेदन आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना  देण्यात आले. त्यात म्हटले आहे की , १३ मे २०१९ मध्ये राज्य सरकारने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यास पत्र पाठवून तसा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबादच्या नगर परिषदेस  तीन ते चार वेळा पत्र  पाठवून सात दिवसाच्या आत आपला अभिप्राय कळवण्याचे सूचित केले होते. 

उस्मानाबादचे नगराध्यक्ष शिवसेनेचे असताना, उस्मानाबादच्या नामांतराबाबत ठराव घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसा ठराव घेण्यास कचरत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. 

उस्मानाबादच्या नामांतराची ठिणगी पुन्हा एकदा पडली असून, नामांतराबाबत भाजपचे कार्यकर्ते अग्रेसिव्ह झाले आहेत.  

याबाबत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना विचारले असता, कायदेशीर बाबी तपासून नामांतर ठराव घेतला जाईल, असे उत्तर दिले.