उस्मानाबाद नगरपरिषदेचे शिक्षक डिसेंबरपासून पगारीविना

न्यायालयात जाण्याचा एकमुखी निर्णय
 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद नगर परिषद अंतर्गत सुरु असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा डिसेंबर २०२० पासून आजपर्यंत पगारच करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. विशेष म्हणजे या शिक्षकांनी चौकाचौकात उभे राहून कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवा देखील बजावलेल्या आहेत. त्यांचा नगरपरिषदेने पगार न केल्यामुळे त्यांना एक प्रकारे वार्‍यावर सोडून देण्याचे धोरण नगरपरिषदेने अवलंबिले आहे की काय ? असा संतप्त सवाल शिक्षकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.


उस्मानाबाद नगर परिषदेच्या अंतर्गत असलेल्या २६  शाळेमध्ये ८२ शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. मार्च २०२० पासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे नगर परिषदेच्या सर्व शिक्षकांनी घरोघरी जाऊन दोन वेळी सर्वेक्षण केले आहे. तसेच माझे कुटूंब, माझी जबाबदारी हा सर्वे ॲपद्वारे पूर्ण केला. तर चेक पोस्टवर दिवस व रात्र पाळीमध्ये देखील काम केले आहे. तसेच पोलिसांबरोबर दंड वसुलीसाठी चौकाचौकात थांबून त्यांना सहकार्य केले आहे.  


मार्च २०२० चे २५ टक्के वेतन व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता नगर परिषदेला उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडून प्राप्त झालेला असताना देखील ती रक्कम अद्यापपर्यंत दिलेली नाही हे विशेष. त्यामुळे थकीत रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ जिल्हा शाखेच्यावतीने नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे मागणी करून हा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे. मात्र अद्यापपर्यंत यावर कुठलीच पावले उचललेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत असून वेळेवर वेतन होत नसल्यामुळे जीवन विमा, बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर न गेल्यामुळे त्याचा आर्थिक भार शिक्षकांना सोसावा लागत आहे. 


शिक्षकांच्या वेतनासाठी उपसंचालक कार्यालयाकडून ८० टक्के व नगर परिषद संचालनालय, वरळी कार्यालयाकडून नगरपरिषदेला दिलेल्या सहाय्यक अनुदानातून २० टक्के रक्कम देण्यात यावी असा शासन निर्णय आहे. परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शिक्षकांच्या समोर अनेक अडचणी उभा राहिलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचे थकीत वेतन देण्यात यावे या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले असून महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाची दि. ६ मार्च रोजी समता नगर येथील शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक घेऊन या संदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.


 या बैठकीस जिल्हाध्यक्ष शामराव कोळी, राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत घाटेराव, कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, मार्गदर्शक जयंत इंदापूरकर, शंकर घंटे, गुणवंत टारफे, संगीता शिंदे, सुवर्णा धोत्रे, स्नेहलता कुलकर्णी, आतेसा फातेमा, नसीम बेगम, एस.आय. पिरजादे, एस.एच. बुलबुले, ए.झेड‌. अन्सारी, पी.आर. जांभळे, एम.पी. सुरवसे, एस.के. कळबट, एस.एस. सय्यद, बी.बी. वीर, मशायक सैय्यद अयाज, अब्दुल हलीम, व्ही.ए.  काझी, ए.व्ही. मोरे, ए.के. जावळे, ए.ए. लावंड, एम.एस. पाटील, आर.जी. मुजावर, एल.एस. लोमटे, श्रीकांत माळोदे, अतुल कनोजवार, विश्वंभर माने, मनोज भोयरे व एस.बी खंगले‌ आदी शिक्षक उपस्थित होते.