उस्मानाबादेत उद्यापासून रविवारचा आठवडी बाजार भरणार

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी होणारा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. तसेच यापुढे दर रविवारी भरणारा आठवडी बाजारास परवानगी देण्यात आली आहे. 



कोरोनाच्या संसर्गामुळे सहा महिन्यापासून उस्मानाबाद शहरात दर रविवारी जनता कर्फ्यू पाळला जात होता. यामुळे शहरातील आठवडी बाजारही बंद ठेवला जात होता. मात्र, २३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून जनता कर्फ्यू मागे घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात पाळण्यात येणारा दर रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेण्यात आला असून उस्मानाबाद नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजार २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, तसेच शासनाने वेळोवेळी कोविड-१९ अनुषंगाने निर्देशित केलेल्या आदेशाचे व सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


.

दुकानदार व भाजी विक्रेत्यांनी स्वत:चे सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, मास्क ठेवणे बंधनकारक राहील, कोविड-१९ दरम्यान शासनाने आठवडी बाजारासंदर्भात निर्गमित केलेल्या दिशानिर्देशांचे तंतोतंत पालन करणे सर्व नागरिकांवर बंधनकारक आहे, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


यामुळे २५ ऑक्टोबर रोजी शहरातील आठवडी बाजार सुरू करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी कोविड- १९ बाबात शासनाने घालून दिलेले निकष पाळण्याची गरज आहे. यामध्ये गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून फिजिकल डिस्टन्स ठेवण्याची गरज आहे