जयंत पाटील राजकारणातले धर्मेंद्र... 

काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्याकडून स्तुतीसुमने 
 

औसा  - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील धर्मेंद्र आहेत. राजकारणात अनेक राजेश खन्ना, अमिताभ आले आणि गेले पण जयंत पाटील यांची लोकप्रियता काही कमी झाली नाही असं म्हणत काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची स्तूती केली 

आज लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या १० विकास कामांचा शुभारंभ व ३ विकास कामांचा लोकार्पण सोहळा कोरोनाचे संपूर्ण नियम पाळत संपन्न झाला. यावेळी माजी आमदार बसवराज पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की जयंत पाटील यांनी नेहमीच राजकारणापलीकडे नाते जपले आहे. औसा येथील कारखान्याच्या निर्माणावेळी चेकचे काम प्रलंबित होते. जयंतराव राज्याचे अर्थमंत्री होते आणि त्यांचा अपघात झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. शेवटी कसाबसा त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवला. त्याच्या दुसऱ्या तासाला जयंत पाटील यांचा फोन आला आणि आपले चेक करतो आहे असे त्यांनी सांगितलं. हा किस्सा सांगत बसवराज पाटील यांनी जयंत पाटील यांच्या कार्यतत्परतेचा अनुभव सांगितला 

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार बसवराज पाटील, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते