उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व दुकाने सर्व दिवस उघडे ठेवण्याची परवानगी द्या !

 
 खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट   



उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आहे. हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याने सर्व  दुकाने आठवड्यातील सर्व दिवस उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा झडत  आहे. 

गेल्या ४५ दिवसापासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे अर्थचक्र बिघडले आहे. शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व दुकाने किमान ठराविक वेळेत सुरु करण्याची गरज आहे. पहिल्यांदा आठवड्यातील सर्व दिवस दुकाने उघडे ठेवण्याचा आदेश काढण्यात आला होता, पण हा आदेश  पुन्हा मागे घेण्यात आला आणि केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीनच दिवस दुकाने उघडे ठेवण्याचा तेही ठराविक वेळेत असा नवा आदेश काढण्यात आला आहे.  यामुळे मोठी गर्दी होणार आहे. त्यासाठी आठवड्यातील सर्व दिवस दुकाने उघडे ठेवण्याची गरज आहे. 

दुकाने उघडे ठेवताना  सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे तसेच ग्राहकांनी तोंडावर मास्क लावणे, दुचाकीवर एकटेच जाणे  हा नियम बरोबर आहे, पण दुकाने फक्त तीनच दिवस उघडे ठेवणे हा निर्णय अन्यायकारक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. उलट यामुळे गर्दी वाढणार आहे, असे अनेकांनी सोशल मीडियावर लिहिले  आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व  दुकाने आठवड्यातील सर्व दिवस उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी  खासदार ओमराजे निंबाळकर, यांनी जिल्हाधिकारी  सौ.दिपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी  आ. कैलास घाडगे-पाटील आणि  उस्मानाबादचे नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर  उपस्थित होते. 

दि 04 मे रोजी काढलेल्या आदेशानुसार आठवड्यातील फक्त 3 दिवस भाजीपाला व किराणा दुकाने चालू राहणार आहेत. या आदेशाचा सर्व सामान्यांची गैरसोय होणार होती. यामध्ये भाजीपाला, किराणा दुकाने तसेच इत्यादी जीवनावश्यक वस्तूची दुकाने दररोज पूर्ण वेळ चालू ठेवावी यामुळे सर्व सामन्याची गैरसोय होणार नाही.  त्याकरिता आदेशात दुरुस्ती करण्याची विनंती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली.