उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय अधिकारी लाच मागत असेल तर... 

लाच लुचपत कार्यालयाशी संपर्क साधून  तक्रारी नोंदवा - पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे
 

उस्मानाबाद  -  कोणत्याही शासकीय अथवा खासगी कामासाठी एखाद्या अधिकाऱ्याने किंवा व्यक्तीने काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाच देण्यासाठी नागरिकांनी स्पष्टपणे नाकारले पाहिजे. त्याबरोबरच लाचखोरीला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लाच लुचपत कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबत तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२०  नोव्हेंबर रोजी केले.

येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे व अशोक हुलगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. खाडे म्हणाले की, लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा असून याबाबत कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र याची माहिती अनेक नागरिकांना नसल्यामुळे तेरे लाच देतात. याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमच्या विभागाबरोबरच पत्रकारांनी देखील आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जनजागृती करण्यासाठी मोठी भूमिका निभावणे महत्त्वाचे असून नागरिकांनी देखील त्यांच्याकडे एखाद्या व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने तसेच कर्मचाऱ्याने शासकीय किंवा खासगी स्वरूपातील काम करण्यासाठी लाच मागितली तर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क तक्रार देणे आवश्यक आहे.

 तक्रार दाखल करणे आवश्यक असून तक्रार दाखल होताच याबाबत खात्रीशीरपणे व निश्चितपणे परंतू अतिशय गुप्तपणे संबंधित लाचखोरा विरोधात कारवाई करण्यात येते. तसेच उस्मानाबाद  कार्यालयात याबाबत सतर्कता बाळगण्या बरोबरच ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, लाचलुचपत बाबतची कारवाई करण्यासाठी शासकीय वाहना बरोबरच खासगी वाहनांचा देखील वापर करण्यात येणार आहे.

अवैध संपत्ती व भ्रष्टाचाराबाबत कारवाई

एखाद्या व्यक्तीकडे अवैध संपत्ती असेल व त्याबाबत ठोस पुराव्यासह या विभागाकडे कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केल्यास त्याबाबत निश्चितपणे कारवाई केली जाईल. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी देखील कारवाई करण्यात येत असल्यामुळे भ्रष्टाचारासंदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी ठोस पुराव्यासह या विभागाकडे येऊन आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.