उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - खा. संभाजीराजे 

पुरात वाहून गेलेल्या इर्लाच्या बालाजी कांबळे कुटुंबाचे सांत्वन
 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने उस्मानाबाद जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे  यांनी केली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त दाऊतपूर, इर्ला , रामवाडी गावांना भर पावसात भेटी दिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात आता मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या भेटीची गरज नाही. शासकीय आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आली आहे. राज्य सरकराने एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. 

मराठवाडा व परिसरात कमी पाऊस असतो परंतू गेल्या कांही दिवसात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी बंधुच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने कॅबीनेट बैठक घेऊन युध्दपातळीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली. 

पुरात वाहून गेलेल्या इर्लाच्या बालाजी कांबळे कुटुंबाचे सांत्वन

इर्ला येथील बालाजी कांबळे हा ३२ वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे. दहा दिवस झाले तरी त्याचा मृतदेह सापडलेला नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते इर्ला गावात गेले पण कुणीही बालाजी कांबळे कुटुंबाचे सांत्वन केले नाही. मात्र कोल्हापूरहून आलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बालाजी कांबळे याच्या आई -वडिलांची इर्ला येथे जावून भेट घेवून त्यांना धीर दिला

घरातील कर्ता गेल्याने वृद्ध आई-वडील खचून गेले असल्याचे चित्र दिसताच खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी फोनवर संपर्क साधत या कुटुंबास तात्काळ मदतीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या . यावेळी जिल्हाधिकारी यांनीही तसा अहवाल करून तात्काळ कुटुंबास आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली , जरी  सरकारने मदत दिली नाही तर मी वैयक्तिक आपणास मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी  दिले. या भेटीच्या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील, रोहित पडवळ, शिवराज्यभिषेक सोहळ्याचे विष्णू इंगळे, आकाश  मुंडे, मोसीन पठाण आदी उपस्थित होते.