धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागाला लागली आग 

आग लागली की लावली ? चर्चेला उधाण 
 

धाराशिव - धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा आणि नगर परिषद प्रशासन विभागाला आज अचानक आग लावून अनेक महत्वाच्या फाईल्स तसेच संगणक जळून खाक झाले. ही आग लागली की लावली ? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

नुकताच उघड झालेला करोडो रुपयांचा मध्यानह भोजन घोटाळा, नगर परिषदेतील विविध घोटाळे यासह अनेक अनेक चौकशी प्रकरणे व इतर कागदपत्रे ही नगर परिषद प्रशासन विभागात होती. कोणती कागदपत्रे जळून खाक झाली हे अजून समोर आले नाही. नगर पालिकेचे एक निलंबित मुख्याधिकारी आणि अनेक कर्मचारी या घोटाळ्यात अडकले होते, त्यांनीच तर ही आग लावली नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

धाराशिव जिल्हाधिकारी सुरक्षित नाही, येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही तसेच आग लागली तर विझवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत हे यावरून सिद्ध झाले आहे. या आगीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. गंभीर बाब म्हणजे आग लागून अनेक तास उलटले तरी त्याची पोलीसाना  पंचनामा करण्यासाठी बोलवण्यात आले नाही, त्याअगोदरच जळालेल्या फाईल्सची विल्हेवाट लावण्यात आल्याने शंकेची पाल चुकचुकत आहे.