आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या सत्कार समारंभावरून ठाकरे सेनेचे टीकास्त्र

धाराशिव - मागील 15 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध प्रकल्प आणि योजनांसाठी पाच हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी खेचून आणल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा युथ फोरमच्यावतीने नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार शहाजीबापू पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत मावजीनाथबुवा, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, डॉ. सतीश कदम यांच्यासह शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव जिल्हा मागास नाही, असे बोलणारे लबाड आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी जिल्ह्याला विकासाच्या एका टप्प्यावर आणून ठेवले आहे. शाश्वत पाणी, हक्काचा रोजगार आणि सकारात्मक मानसिकता या तीन महत्वपूर्ण बाबींवर आपला भर आहे. त्यामुळे किती हजार कोटी रूपयांचा निधी आणला, यापेक्षा कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकासाचा हा प्रवास सुरू आहे, हे अधिक महत्वाचे आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या जिल्ह्याच्या सगळ्या महत्वपूर्ण बाबींना आता वेग आला आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान या सत्कार समारंभावरून ठाकरे सेनेचे टीकास्त्र सोडले असून,आज दिवसभर सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगले आहे. स्वतःच कार्यक्रम ठेवायचा,आणि स्वतःचाच सत्कार करून घ्यायचा हे भारीय... 5 हजार कोटी इतका इकास कुणी केलाय व्हय ? हे तर मुदीच्या पुढचं निघालं अशी टीका शिवसेनेचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी केली आहे.
अन्य प्रतिक्रिया वाचा