महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा

 
s

उस्मानाबाद :- जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.

 या योजनेअंतर्गत जिल्हयामध्ये बँकांनी 71 हजार 740 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी जिल्हयातील 607 गावांतील 40 हजार 483 लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या याद्या गांवांतील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय आणि बँक शाखेमध्ये प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

              या योजनेस पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांची नांवे यादीत प्रसिध्द झालेली नाहीत, त्यांची यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी काळजी करु नये. तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-ईसेवाकेंद्र, सी. एस. सी. सेंटर किंवा बँक शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.

From around the web