उस्मानाबाद-बीड जिल्हयास जून 2023 पर्यंत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून पाणी देणार

 -जलसंपदा मंत्री जयंत पाटील
 
as

उस्मानाबाद - कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यास परवानगी देऊन या कामांचे प्राधान्य क्रम फेब्रुवारी 2021 रोजी ठरवून दिले आहेत.या कामासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधीही यावर्षी उपलब्ध करुन दिली आहे.ही कामे प्राधान्याने पूर्ण करुन येत्या जून 2023 पर्यत उस्मानाबाद-बीड जिल्हयातील लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी  आज येथे केले.

     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील पाठबंधारे विभागाच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे,सुरेश धस,ज्ञानराज चौगुले,कैलास पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के.बी.कुलकर्णी,मुख्य अभियंता दिलीप पवार,अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, कार्यकारी अभियंता के.ई. घुगे,कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे आदी उपस्थित होते.

     या सिंचन प्रकल्पासाठी पुढील दोन वर्षात लागणा-या निधीचे सुक्ष्म नियोजन करा.त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,ज्या आडचणी आहेत त्या मला वारंवार सांगा त्या सर्व आडचणी मी सोडवेल. त्यासाठी अधीक्षक अभियंत्यानी मंत्रालयात येऊन सातत्याने माझ्यासंपर्कात राहुन या प्रकल्पाशी संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा.ज्या कामांच्या निविदा काढावयाच्या आहेत. त्या तातडीने काढा. ही कामे योग्य आणि वेळेत पूर्ण करु शकणारे कंत्राटदार असावेत.आपण लक्षांक आधारित काम करुन हे काम वेळेत पूर्ण करावयाचे आहे,यादृष्टीने नियोजन करुन कार्यपूर्तीसाठी प्रयत्न करा,असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

     कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत 15 फेब्रुवारी 2021 रोजी दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरु करण्यास  मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे ही सर्व कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे उपसा सिंचन योजना क्रमांक 7,दुधाळवाडी साठवण तलाव  आणि उपसा सिंचन योजना-क्रमांक-दोन रामदरा (ता.तुळजापूर)पर्यंत 5.32 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होऊन24000 हजार हेक्टर शेती  सिंचनाखाली येणार आहे. या योजनेचा लाभ उस्मानाबाद जिल्हयातील आठही तालुक्यांना होणार आहे,असे सांगून जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले ,बीड जिल्हयातील आष्टी तालुक्यास उपसा सिंचन प्रकल्प-तीन मध्ये 1.68 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.यातून आष्टी तालुक्यातील 8147 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

     दुधाळवाडी आणि कळंब तालुक्यातील या प्रकल्पातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची विनंती आमदार कैलास पाटील यांनी केली त्यावर मंत्री पाटील यांनी याकामासाठी या वर्षी व पुढील वर्षी किती निधी लागेल यांचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुन द्यावे, त्यांचे आर्थिक नियोजन करु असे आश्वासनही दिले. तसेच लोहारा आणि उमरगा तालुक्यातील या योजनेतील कामांना प्राधान्य देण्याची मागणी आमदार चौगुले यांनी केली असता याही कामांना प्राधान्य द्यावे, असेही आदेश मंत्री पाटील यांनी यावेळी दिले. जलसंपदा विभागाच्या कामांसाठी 15 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी कर्ज स्वरूपात उभारण्याचा प्रयत्नही सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा मंत्री पाटील यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देऊन या कामास गती दिल्याबद्दल खा.ओमराजे राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबादकरांच्या वतीने त्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. आमदार धस यांनीही या प्रकल्पात स्वत: मंत्री लक्ष घालत आहेत. कामांचा पाठपुरावा करत आहेत. निधी उपलब्ध करून देत आहेत. खूप सकारात्मक असल्याबद्दल मंत्री पाटील यांचे आभार मानले.

From around the web