कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तीन मृत्यू
Jun 14, 2020, 14:55 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील दोन आणि कारी येथील एक अश्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या सहा झाली आहे.
उस्मानाबाद शहरातील देवी मंदिर परिसरातील एका २५ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला होता, त्यानंतर आज ( रविवारी ) उस्मानाबाद शहरातीलच उस्मानपुरा, काकानगर भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता, त्यास मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता, असे सांगण्यात आले.
उस्मानाबादेतील कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू
उस्मानाबादेतील कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू
त्यानंतर कारी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या वृद्धास काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यास उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. दहा दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु त्याचा देखील मृत्यू झालेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी तीन रुग्ण लातूर, सोलापूर आणि पुणे येथे ऍडमिट आहेत. त्यांची नोंद उस्मानाबाद मध्ये नाही. उर्वरित १४३ पैकी सहा बळी गेले आहेत. त्यात . गेल्या २४ तासात तीन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आज दुपारी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील पाथर्डी गावात पाहुणा आलेला हा युवक हायरिस्क भागातून परतला होता. त्याला काविळ आजाराने ग्रासलेले होते, असे समजते. दरम्यान, कोरोनाची लक्षणे आढळल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला कळंब उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या युवकाचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला हे अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. गेल्या चोवीस तासांत उस्मानाबाद जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी तिघांचा कोरोनाने बळी गेला आहे.जिल्ह्यामध्ये संशयितांची संख्या ७,५५३ एवढी असून, त्यातील ७,५२९ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६,४७९ होम क्वारंटाईन, तर १,०५० नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत ५,१३१ जणांनी चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. १,६५८ एवढ्या नागरिकांना घरी पाठविण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत असले तरी कोरोना बळीचा आकडा सहावर पोचला आहे.
कोरोना बाधित रुग्ण - १४६
बरे झालेले रुग्ण - १०५
मृत्यू पावलेले रुग्ण - ६