उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा

 
 उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा


 उस्मानाबाद -  रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणेसाठी राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मान्यता दिलेली आहे.


पिक विमा योजना हि कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असुन कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणे बाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.


या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पिक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक च्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे.


संरक्षित रकमेवर दिलेल्या पिक विमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे त्याचा तपशिल पूढील प्रमाणे आहे. पिकाचे नाव, विमा संरक्षित रक्कम रु. प्रति हेक्टरी, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम रु. प्रति हेक्टरी, पिक विमा भरावयाची अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहेत.


 रब्बी ज्वारी बागायत-30000/-,450/-,दि. 30 नोव्हेंबर 2020, रब्बी ज्वारी जिरायत-28000/-,420/-,दि.30नोव्हेंबर 2020, गहु बागायत-38000/-,570/-,दि.15डिसेंबर-2020,हरभरा-35000/-,525/-,दि.15डिसेंबर 2020, रब्बीकांदा-80000/-,4000/-,दि.15डिसेंबर-2020, उन्हाळी भुईमुग-40000/-,600/-,दि.31 मार्च 2021.


पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. असे अवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.

From around the web